एखादे असत्य इंटरनेटवर वारंवार प्रसिद्ध झाले, की ‘एआय’लाही ते सत्य वाटू लागते! प्रोपगंडातील या गोबेल्सी तंत्राचा उत्तम नमुना म्हणजे नेताजी-सावरकर संबंधांविषयीची सुरस आणि चमत्कारिक कहाणी. गेल्या अनेक वर्षांपासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ‘अपहरण’ करण्याचा प्रयत्न हिंदुत्त्ववाद्यांनी चालवला आहे. नेताजी हे मूळचे समाजवादी. डावे. आजच्या हिंदुत्त्ववाद्यांच्या शब्दावलीनुसार त्यांना अर्बन नक्सल असेही म्हणता येईल. पण ते क्रांतिकारी. त्यामुळे त्यांना महात्मा गांधी व पं. नेहरूंपासून दूर करून हिंदुत्त्ववाद्यांचे ‘आयकॉन’ वि. दा. सावरकर यांच्या शेजारी बसवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही मिथ्यकथा हा त्याचाच एक भाग.
या कथेचा प्रारंभबिंदू आहे २२ जून १९४०. या दिवशी सायंकाळी दादर येथील ‘सावरकर सदना’त या दोन नेत्यांची भेट झाली. या कथेतील सत्याचा हा सर्वांत मोठा भाग. कोणताही प्रोपगंडा हा सत्याच्या अंशावर उभा असावा लागतो. तो हा अंश. त्यावर पुढची, या भेटीत या दोन नेत्यांची जी चर्चा झाली, त्याबाबतची मिथ्यकथा उभी आहे. काय होती ती चर्चा?
‘सावरकर डॉट ओआरजी’ हे सावरकरांचे जीवनकार्य व विचार यांचा प्रचार-प्रसार करणारे इंग्रजी संकेतस्थळ. मान्यवर सावरकरवाद्यांच्या साह्याने ते तयार करण्यात आले आहे. त्यातील ‘क्यू अँड ए’ विभागात याविषयीची नोंद आहे. असे अनेक लेख इंटरनेटवर आहेत. त्या लेखांचे सार असे, की सावरकरांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान जी लष्करीकरणाची चळवळ चालवली होती, ती त्यांच्या क्रांतिकारी कार्यक्रमाचाच एक भाग होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देशाबाहेर जाऊन स्वातंत्र्यलढा सुरू करण्याची सूचना केली ती सावरकरांनीच. ‘तुम्ही गुपचूप देश सोडा. जर्मनी आणि जपानमध्ये जाऊन तेथे युद्धबंद्यांमधून भारताच्या स्वातंत्र्यासाठीची सेना उभारण्याचा प्रयत्न करा,’ असे सावरकरांनी सुभाषबाबूंना सूचवले असे सांगितले जाते. सुभाषबाबू यांची समाजवादी विचारसरणी, त्यांचे हिंदू-मुस्लीम ऐक्याविषयीचे विचार, सावरकरांच्या हिंदू महासभेस त्यांचा असलेला विरोध, या पार्श्वभूमीवर हे सारे केवळ अविश्वसनीयच नव्हे, तर हास्यास्पद वाटते. तरीही जर असे सांगितले जात असेल, तर ते कोणत्या आधारावर?
कीर यांच्या सावरकर चरित्रात म्हटले आहे – “हे उघड गुपित आहे की शिवाजी आणि त्यांच्या राजकारणाचे भक्त असलेल्या सुभाष यांनी २२ जून १९४० रोजी, म्हणजे भारतातून जानेवारी १९४१ रोजी नाट्यमयरीत्या नाहीसे होण्याच्या सहा महिने आधी, सावरकर सदन येथे सावरकरांशी दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात भारतीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती याविषयी चर्चा केली. याच चर्चेदरम्यान ‘भारताचे मॅझिनी’ सावरकर यांनी ‘भारताचे गॅरिबाल्डी’ सुभाष बोस यांना स्वातंत्र्यलढा तीव्र करण्याकरीता देशाबाहेर जाऊन सशस्त्र क्रांती करण्याच्या कल्पनेने प्रेरित केले.’’
त्या भेटीत काय घडले याची कुठेही नोंद नाही, असे सांगितले जाते. मग कीर यांना ही माहिती कोणी दिली? त्यांनी पुस्तकात कोठेही याचा स्रोत वा आधार नोंदवलेला नाही. कीर यांचे हे पुस्तक आहे १९५० मधील. तेव्हा सुभाषबाबूंची प्रतिमा, लोकप्रियता आकाशास भिडलेली होती. अशा काळात कीर यांना ‘कुणीतरी’ ही माहिती पुरवलेली दिसते. त्यांनीही सावरकरांना इटालियन क्रांतिकारक ‘मॅझिनी’ची आणि सुभाषबाबूंना मॅझिनीचे अनुयायी ‘गॅरिबाल्डी’ यांची उपमा देवून त्यांच्यात अलगद गुरू-शिष्याचे नाते तयार केले.
दुसरे पुस्तक जे. जॉर्ज ओहसावा या जपानी लेखकाचे. सावरकर आणि सुभाषबाबू यांची ती ‘वैयक्तिक आणि खासगी’ भेट होती. या भेटीत ‘भारत सोडण्याचा प्रयत्न करण्याची’ तसेच ‘जर्मनीत जाऊन भारतीय युद्धकैद्यांची फौज उभारण्याची’ आणि मग नंतर ‘जर्मनीच्या साह्याने जपानला जाऊन रासबिहारी बोस यांच्याशी हातमिळवणी करण्याची ‘ठोस सूचना’ सावरकरांनी केली होती’, असे त्या पुस्तकात म्हटलेले आहे. पण हे काही त्या जपानी लेखकाने म्हटलेले नाही. हा मजकूर आहे पुस्तकाच्या परिशिष्टात छापण्यात आलेल्या एका पत्रातील. ते पत्र आहे पुस्तकाचे प्रकाशक के. सी. दास यांच्या नावे आलेले. त्यावर तारीख आहे २ जून १९५४ आणि ते पाठवले आहे, सावरकरांच्या सूचनेवरून त्यांच्या ‘बाळ’ नामक सचिवाने!
अखेरचा आणि ‘सावरकर डॉट ओआरजी’मधील त्या लेखात म्हटल्यानुसार तो ‘एकुलता एक उपलब्ध स्त्रोत’ म्हणजे ‘अभिनव भारत संघटने’च्या विसर्जन कार्यक्रमात सावरकरांनी केलेले भाषण. ११ मे १९५२ रोजी सायंकाळी पर्वती तळ्याजवळील क्रांतिस्मृती नगरात झालेल्या या भाषणात सावरकरांनी स्वतःच त्या भेटीविषयी - प्रकट सभेत पहिल्यांदाच - माहिती दिली. त्या भेटीतील चर्चेविषयी सांगून ते म्हणाले, की मी बोस यांना म्हणालो, की ‘सारबिहारीसारखे अनेक सशस्त्र क्रांतिकारक पुढारी जसे हिंदुस्थानातून ब्रिटिशांच्या हातावरी तुरी देऊन जपान, जर्मनी येथे निसटून गेले, तसे आपणही तत्काल हुलकांडी देऊन निसटून जावे. तिकडे इटली, जर्मनीच्या हाती पडलेल्या सहस्रावधी हिंदी सैनिकांचे पुढारीपण उघडपणे स्वीकारावे. हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्याची प्रकट घोषणा करावी आणि जपान युद्धात पडताच साधेल त्या मार्गाने बंगालच्या उपसागरातून म्हणा किंवा ब्रह्मदेशातून म्हणा, हिंदुस्थानातील ब्रिटिशसत्तेवर बाहेरून स्वारी करावी.’ सावरकरांच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी नेताजी काही बोलले नाहीत. पण नंतर ते हिंदुस्थानातून निसटले. अर्थ असा, की त्यांनी सावरकरांचा सल्ला मानला. त्यांना प्रेरणा दिली सावरकरांनी. स्वतः सावरकर हेच हे सांगतात. त्यांचे चरित्रकार हे सांगतात. आणि त्यावरून बाकीचे सावरकरभक्त हेच म्हणतात. ‘सावरकर डॉट ओआरजी’ सांगते, की या भेटीतील चर्चेची कुठेही - हिंदू महासभेच्या अहवालांतही नोंद नाही. का? तर ‘हे दोन्ही नेते ब्रिटिशविरोधी कारवायांत सहभागी असल्याने अशा संवेदनशील बाबीची नोंद ठेवणे अयोग्य ठरले असते.’ पण यानंतर साळसूदपणे या संकेतस्थळात असे नोंदवले आहे, की ‘बोस यांच्या कागदपत्रांत वा लेखनातसुद्धा कुठेही या बैठकीविषयीचा संदर्भ येत नाही. तेव्हा आपणांस जो एकमेव स्रोत उपलब्ध आहे त्यावरच विश्वास ठेवावा लागेल. अन्यथा त्या दोन नेत्यांमध्ये काय बोलणे झाले ते सांगणे अशक्य आहे.’ हा स्रोत कोणता? तर स्वतः सावरकर. तो मान्य करण्यास हरकत नव्हती. पण केव्हा, तर सावरकरांचे संकेतस्थळ सांगते, त्याप्रमाणे या भेटीची कोणतीच नोंद उपलब्ध नसती तर. परंतु तशी नोंद आहे. आणि ती करून ठेवलेली आहे खुद्द सुभाषबाबूंनीच.
नेताजींनी जर्मनीत सप्टेंबर १९४१ ते फेब्रुवारी १९४३ या कालावधीत एक पुस्तक लिहिले होते. ‘इंडियन स्ट्रगल १९३५ - १९४२’ हे त्याचे नाव. त्यात ते या भेटीविषयी लिहितात, ‘सावरकर यांना आंतरराष्ट्रीय परिस्थितीबाबत काही माहितीच नाही असे वाटत होते. ब्रिटिश फौजेत भरती होऊन हिंदूंना लष्करी प्रशिक्षण कसे मिळू शकेल एवढाच विचार ते करत होते.’ यात कुठेही सावरकरांनी आपल्याला जर्मनी आणि जपानला जाऊन सशस्त्रलढा उभारा वगैरे सूचना केल्याचे सुभाषबाबूंनी म्हटलेले नाही. सावरकरांनी तसा सल्ला दिला असता, तर सुभाषबाबूंनी नक्कीच त्याची नोंद केली असती. ते लपून ठेवण्याचे त्यांना काही कारणच नव्हते. जर्मनीत काही त्यांना ब्रिटिशांची भीती नव्हती.
या भेटकथेतून असेही भासवले जाते की, सुभाषबाबूंनी मुंबईत येऊन एकट्या सावरकरांची भेट घेऊन, त्यांच्याशी राजकीय चर्चा केली. वस्तुस्थिती अशी आहे, की मुंबईच्या त्या दौऱ्यात सुभाषबाबूंनी हिंदू महासभेच्या सावरकरांप्रमाणेच मुस्लिम लीगच्या मोहम्मद अली जीना यांचीही भेट घेतली होती. एवढेच नव्हे, तर त्या भेटीत त्यांनी जीनांपुढे असा प्रस्ताव ठेवला होता, की ते पाहून आज अनेकांना फेफरे येईल. ‘आपण सारे आणि काँग्रेस मिळून स्वातंत्र्यासाठी संयुक्त लढा देऊ. तो यशस्वी झाला तर तुम्हाला स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान करू’, असा तो प्रस्ताव होता. हे सुभाषबाबूंनीच ‘इंडियन स्ट्रगल’मध्ये लिहून ठेवलेले आहे. त्यांनी सावरकर आणि जीना यांची भेट घेतली होती, ती केवळ त्या दोघांनी काँग्रेसबरोबर स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हावे, असा प्रयत्न करण्यासाठी. पण त्यात त्यांचा अपेक्षाभंगच झाला. सुभाषबाबू लिहितात, ‘या मुलाखतींतून एकच निष्कर्ष काढणे भाग पडले की, हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग यांच्याकडून कशाचीच अपेक्षा करता येणार नाही.’
पुढे १९४२ सालीही सुभाषबाबूंनी असा एक प्रयत्न केल्याचे दिसते. ३१ ऑगस्ट १९४२ रोजी आझाद हिंद रेडिओवरून केलेल्या भाषणात ते म्हणतात - ‘श्री. जीना आणि श्री. सावरकर आणि ते सर्व नेते की, जे ब्रिटिशांशी तडजोड करण्याचा विचार करत आहेत, त्यांना मी विनंती करतो की, उद्या जगात हे ब्रिटिश साम्राज्य असणार नाही, हे एकदाचे लक्षात घ्या. आज ज्या व्यक्ती, गट किंवा पक्ष स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी होतील त्यांना उद्या भारतात सन्मानाचे स्थान मिळणार आहे.’ सावरकर हे ब्रिटिशांची तडजोड करण्याचा विचार करीत आहेत, असा थेट आरोप नेताजींनी येथे केलेला आहे. त्यांच्या आझाद हिंद सेनेमागे सावरकरांची प्रेरणा असती, सावरकर हे येथील तरूणांना ब्रिटिशांच्या लष्करात भरती व्हा असे सांगत होते ते स्वातंत्र्यलढ्यासाठी, असे नेताजींना वाटत असते, तर त्यांनी असा आरोप केला नसता.
नेताजी जेव्हा जर्मनीत ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी भारतीय युद्धबंद्यांची फौज तयार करत होते, तेव्हा इकडे सावरकर हिंदू तरुणांना सांगत होते की, ब्रिटिशांच्या फौजेत भरती व्हा. याचा अर्थ सावरकर पर्यायाने सुभाषबाबूंच्या विरोधातच ब्रिटिशांना साह्यभूत ठरत होते. खासकरून बंगाल आणि आसामातील हिंदूंनी ब्रिटिश फौजेत सामील व्हावे, यासाठी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे, असे आवाहन ते १९४१च्या डिसेंबरमध्ये हिंदू महासभेच्या ज्या भागलपूर अधिवेशनातून करत होते, त्याच अधिवेशनात ते सांगत होते की, जपानच्या युद्धप्रवेशामुळे आपल्यासमोर थेट आणि तातडीने ब्रिटनचा शत्रू उभा ठाकलेला आहे. या युद्धापासून आपल्याला आपले घरदार वाचवलेच पाहिजे आणि म्हणून भारताच्या संरक्षणासाठी सरकार करत असलेल्या युद्धप्रयत्नांची तीव्रता वाढवली पाहिजे.
सावरकरांच्या या विधानांची संगती कशी लावायची? हे आपल्या ‘फेक-कथे’ला तर मारक ठरते. तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी या कथाकारांनी एक मोठा चलाख युक्तिवाद मांडला की, सावरकर हिंदू तरुणांना ब्रिटिश फौजेत भरती व्हा, असे सांगत ते यासाठीच की, ते सैनिक पुढे जाऊन सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेस मिळावेत. या तर्कास काय म्हणावे? जणू काही ब्रिटिश फौजा पराभूत होणार, मग ते हिंदू सैनिक जर्मनी वा जपानचे युद्धकैदी बनणार. मग त्यांना आझाद हिंद फौजेत सहभागी करून घेतले जाणार… हे सारे सावरकरांना आधीच माहीत होते.
मात्र या युक्तिवादाच्या समर्थनार्थ दिला जातो सुभाषबाबूंनी आझाद हिंद रेडिओवरून २५ जून १९४४ रोजी केलेल्या भाषणाचा संदर्भ. त्यात सुभाषबाबूंनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली असून, लष्कर भरतीच्या धोरणाबद्दल सावरकरांचे कौतुक केले आहे. ‘याच तरुणांमधून आझाद हिंद फौजेस प्रशिक्षित माणसे आणि सैनिक मिळत आहेत,’ असे सुभाषबाबूंनी त्या भाषणात म्हटल्याचे सांगण्यात येते.
हे भाषण आले कोठून? ते आले धनंजय कीर यांच्या ‘वीर सावरकर’ या इंग्रजी पुस्तकाच्या पान क्र. ३५०वरून. या भाषणासाठी सर्व सावरकर चरित्रकार, अभ्यासक आणि प्रेमी मंडळी हवाला देतात तो कीर यांच्या पुस्तकाचा. पण त्या पुस्तकात हे भाषण कोठून आले? कीर यांनी त्याचा स्त्रोत दिला आहे - ‘रासबिहारी बोसेस मेसेज टू सावरकर कोटेड इन इंडियन इंडिपेन्डन्स लीग्ज पब्लिकेशन.’ रासबिहारी हे जपानमधील हिंदू महासभेचे नेते. सावरकरांचे अनुयायी. त्यांनी सावरकरांना पाठवलेला संदेश इंडियन इंडिपेन्डन्स लीगच्या कोण्या प्रकाशनात प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यातून कीर यांनी तो घेतला. हे प्रकाशन नेमके कोणते हे मात्र त्यांनी नमूद केलेले नाही. सुभाषबाबूंच्या भाषणांच्या, लेखांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यात कोठेही हे भाषण नाही. मुळात असे सुभाषबाबूच म्हणाले की काय, याविषयीच शंका निर्माण होते. कारण तो स्त्रोत. तो ‘रासबिहारी बोस यांचा संदेश’ आहे. नेताजींचा नाही. या शंकेस आणखी एक कारण आहे. हे भाषण सिंगापूर रेडिओवरून केल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्या दिवशी - २५ जून १९४४ रोजी नेताजींनी सिंगापूर रेडिओवरून असे काही भाषण केल्याचे दिसत नाही. १३ जुलै १९४३ला ते सिंगापूर रेडिओवरून बोलले. त्यानंतर त्यांचे तेथे भाषण झाले ते २८ सप्टें. १९४४ रोजी. दरम्यानच्या काळात नेताजींचे भाषण सिंगापूर रेडिओवरून प्रसारित झाल्याची नोंद नाही. बर्मा विभागातील जपानचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ मसाकाझू कवाबे यांच्या डायरीतील नोंदींनुसार, नेताजींनी ७ जानेवारी १९४४ रोजी त्यांचा तळ रंगून येथे हलवला होता. २५ जून १९४४च्या सुमारास ते सिंगापूरमध्ये नव्हते!
एकंदर ही नेताजींना सावरकरांनी हिंदुस्थानातून निसटण्याची स्फूर्ती दिली, प्रेरणा दिली ही सारी मिथ्यकथाच. सावरकर यांच्या हिंदू महासभेने स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेससोबत यावे, सर्वांनी एकत्र मिळून लढावे, या हेतूने सुभाषबाबूंनी सावरकरांची भेट घेतली होती, हे खरे. पण त्यात अर्धसत्ये, असत्ये, अपमाहिती यांची भेसळ करून नेताजी हे जणू सावरकरांचे प्रशंसक, अनुयायी असा धुरळा उडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या खोटेपणाने ना सावरकरांचे ‘माहात्म्य’ वाढते, ना सुभाषबाबूंना न्याय दिला जातो. होते ती फक्त बदनामीच. मात्र समाजवादी आणि सेक्युलर सुभाषबाबूंना हिंदुत्ववाद्यांचे सहप्रवासी म्हणून लोकांसमोर सादर करू इच्छिणारे लोक त्याची कशास फिकीर करतील? त्यांना मतलब आहे तो गांधी-नेहरू विरोधात एक शस्त्र म्हणून सुभाषबाबूंची लोकमानसातील प्रतिमा वापरण्यात. त्यासाठीच हा सारा मिथ्यकथांचा पसारा. तो इंटरनेटवर, संकेतस्थळांतून, समाजमाध्यमांतून, लेखांतून इतका पसरलेला आहे, की ‘ग्रोक’सारखे एआय चॅटबॉटही त्यामुळे चकत आहेत. यातून धोक आहे, तो ऐतिहासिक तथ्यांच्या विद्रुपीकरणाचा, इतिहासाच्या विकृतीकरणाचा.
संदर्भ -
1. Hindu Rashtra Darshan - V. D. Savarkar, Maharashtra Prantik Hindusabha, Poona
2. Netaji and India’s Freedom - Proceedings of the International Netaji Seminar 1973 : Ed. Sisir K. Bose, Netaji Bhavan Calcutta, 1975
3. Netaji Collected Works - Vol 2 : Ed. Sisir K. Bose, Netaji Research Bureau
savarkar.org ( http://savarkar.org/en/encyc/2017/5/29/Q-A3.html )
4. Subhas Chandra Bose in Burma (1943-1944) : Pro. K. C. Yadav, Journal of the United Institution of India, Vol. CXLIX, No. 617, Julu-Sept. 2019
5. Selected Speeches of Subhas Chandra Bose : Publication Division, Ministry of Information and Broadcasting, 1962
6. Testament of Subhas Bose 1942-1945 : Arun, Rajkamal Publications, 1946
7. The Indian Struggle 1935-1942 : Subhas Chandra Bose, Chuckervertty, Chatterjee & Company Ltd, Calcutta, 1952
8. The Two Great Indians in Japan : Sri Rash Bihari Bose and Netaji Subhas Chandra Bose, Vol 1 - J. G. Ohsawa, Kusa Publications, Calcutta, 1954
9. Veer Savarkar - Dhananjay Keer, Popular Prakashan, 2nd Ed, Dec. 1966
10. Vinayak Damodar Savarkar: The Untold and Unknown Stories - S. Kaushik, The Commune, 28 May 2020
(https://thecommunemag.com/vinayak-damodar-savarkar-the-untold-and-unknown-stories/ )
11. अभिनव भारत सांगता समारंभ भाषणे - स्वा. विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर. (www.savarkarsmarak.com)
१७ ऑगस्ट २०२५. सावरकर-नेताजी भेट आणि त्याविषयीच्या लोणकढी थापा यावर २२ जून २०२१ रोजी अक्षरनामा मध्ये लेख लिहिला होता. त्या लेखाचा हा विस्तारित भाग.)